भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या चांद्रयान-१ ने चंद्राच्या उत्तर ध्रुवावर बर्फाचे मोठे साठे शोधून काढल्याचे नासाने जाहीर केले आहे. चांद्रयानावर बसविलेल्या नासाच्या ‘मिनी- एसएआर’ या रडारने ही नोंद केली आहे. चंद्रावरील या परिसरात बर्फाने भरलेले ४० हून अधिक विवरे आढळली असून त्यात सुमारे ६०० दशलक्ष टन बर्फ असल्याची माहिती समोर आली आहे.
या नव्या संशोधनामुळे भारताची शान आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणार असून या महत्वाच्या संशोधना मागे चांद्रयानचे यश असल्याचे समजले जाते. पाण्याचा बर्फ असलेले ही विवरे २ ते १५ कि.मी. व्यासाची असून या शोधामुळे चंद्रावरील संशोधनाला अधिक गती मिळेल, असे नासाने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पाण्याची निर्मिती, वाहणे व साठा या प्रक्रिया चंद्रावर आजही सुरू असल्याचे चांद्रयानावरील विविध उपकरणांच्या सहाय्याने मिळविलेल्या माहितीवरून स्पष्ट होत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. चांद्रयान-१ वर बसविलेल्या मिनी-सार या रडारला चंद्राच्या कायम अंधारात असलेल्या ध्रुवावरील भूपृष्ठाचे संशोधन करण्याचे काम देण्यात आले होते. चंद्राचा हा भाग पृथ्वीवरून कधीही दिसत नाही. या रडारने चंद्राच्या ध्रुवीय भागातील रेडीओ लहरीवरून तेथील भूपृष्ठाचा अभ्यास केला आहे.