इस्लामाबाद
मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हफिझ सईद याला भारताने नव्याने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे अटक करण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे. जमात-उद-दावा या संघटनेचा प्रमुख असलेल्या सईदविरोधात भारताने दिलेले पुरावे ‘कारवाई योग्य’ नसल्याचे पाकिस्तानचे म्हटणे आहे.
उभय देशांत २५ फेब्रुवारीला झालेल्या सचिवस्तरीय चर्चेत भारताने पाकिस्तानला मुंबईतील 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यातील सहभागी पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात पुरावा म्हणून तीन कागदपत्राचे संच दिले होते.
त्याचा ‘काळजीपूर्वक’ अभ्यास केल्यानंतर या प्रकरणी पुढील ‘दोन दिवसांत’ काय ते उत्तर देण्याचे पाकने ठरविले असल्याचे वृत्त ‘द न्यूज’ या वृत्तपत्राने आज दिले. अर्थात, याचा अर्थ पाकिस्तान सईदला अटक करणार नाही, असे सूत्रांच्या हवाल्याने या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्तानात राहून भारताविरोधात गरळ ओकणारी विधाने करणार्या सईदविरोधात गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी नाराजी व्यक्त करून मुंबई हल्ल्यातील त्याच्या सहभागाबद्दल पाकने त्याची चौकशी करायला हवी, याचा पुनरूच्चार केला. मात्र पाकने चिदंबरम यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, सचिव पातळीवरील बैठकीसाठी भारताला निमंत्रण देण्याचाही पाकिस्तानचा विचार नसल्याचे ‘द न्यूज’ने वृत्तात म्हटले आहे. उभय देशातील चर्चा ही सर्वसमावेशक मुद्यांच्या चौकटीत व्हायला हवी असा पाकिस्तानचा आग्रह आहे. भारत मात्र दहशतवाद्याच्या मुद्यावरच पाकची कोंडी करू पाहत आहे.
पाकिस्तानने आता भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवरही शस्त्रे परजली आहेत. भारताच्या दहशतवादाच्या आरोपांना उत्तर म्हणून पाकिस्तानेही भारताविरोधात तीनपेक्षा जास्त कागदपत्रांचा संच देणार आहे. त्यात पाकिस्तानी भूमीत भारताने केलेल्या कथित दहशतवादी कारवायांचे पुरावे असतील, असे समजते.
यावर आपले मत नोंदवा